गुलामगिरीविरोधी आंदोलनाचे लोण पोहोचले युरोपमध्ये इंग्लंडमध्ये पुतळे पाडण्यास सुरुवात

    दिनांक : 14-Jun-2020
Total Views |

putla_1  H x W:
 
अमेरिकेतील मियामिपोलीस शहरात जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकी अमेरिकी नागरिकास त्याच्या किरकोळ गुन्हयाबाबत मानेवर गुडघा ठेवून ठार मारण्याच्या विरोधातील आंदोलन जगात पसरत चालले आहे. ‘कोविड 19’ चा प्रसार अधिक की हे आंदोलन मोठे असे वाटावे, एवढा त्याचा विस्तार होत आहे. त्याची इंग्लंडमध्ये जी प्रतिक्रिया उमटत आहे, त्याचा भारताशीही संबंध आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणून सोळाव्या शतकातील गुलामांचा व्यापारी आणि रॉयल आफ्रिकन कंपनीचे अधिकारी एडवर्ड कोल्स्टन यांचा पुतळा जमावाने पाडला व तो नाल्यात फेकून दिला. त्या पाठोपाठ ब्रिटनमधील गुलामगिरीविरोधातील जुन्या नेत्यांचे जे पुतळे आहेत, त्या सार्‍यांविरोधात मोहीमच सुरू झाली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून तेथील सरकारने रॉबर्ट मिलिगनचा पुतळा हलवला. दुसर्‍या महायुद्धाचे ब्रिटनचे नेते सर विन्स्टन चर्चिल यांच्या पुतळयावरही ‘हा माणूस गुलामगिरीला गती देणारा होता’ अशी टिपणी लिहिली आहे. ब्रिटनमधील गुलामगिरीविरोधी संघटनांनी एकूण 76 पुतळयांची यादी संसदेला दिली असून ते पुतळे तातडीने न हलवल्यास उखाडू असा इशारा दिला आहे. इंग्लंडमधील लेबर कौन्सिलच्या 130 सदस्य संस्थांनी ‘ब्रिटनमधील पुतळ्याबाबत पुन:पाहणी -रिव्ह्यू- करण्यात येईल’ असे आश्वासन दिले आहे. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे त्यात भारतात फसवाफसवी करून ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा रॉबर्ट क्लाईव्ह, वंगभंगाचा कारस्थानी लॉर्ड कर्झन आणि भारतीय संस्कृतीच्या विरोधात इंग्रजी कारकुनी संस्कृती आणणारा लॉर्ड मेकॉले याचाही समावेश आहे. सोळाव्या शतकात बोअरवॉरमध्ये भारत, चीन, इजिप्त, कॅनडा, सुदान, दक्षिण आफ्रिका येथे ज्यांनी कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प सुरू केले, त्या सर जॉर्ज सोमर्स त्याचा पुतळा हा आंदोलांचे पुढील लक्ष्य आहे.
 
अमेरिकेतील एका घटनेचे पडसाद म्हणून या घटना घडत आहेत, असा जरी घटनाक्रम वाटला तरी त्याची कारणमीमांसा जुनी आहे. साहजिकच त्याची सुरुवात प्रथम जेंव्हा पहिला गुलाम अमेरिकेत पाठवला त्यावेळी म्हणजे सव्वापाचशे वर्षापूर्वीच होते. पण पहिली साडेचार शतके हे आंदोलन सतत चिरडण्यात आले. यातील सारे आघाडीचे गुलाम व्यापारी हे ब्रिटिश, स्पॅनिश आणि पोर्तुगीज असले तरी त्याच्या विरोधात प्रथम आवाज उठवला तो विसाव्या शतकातील मार्टिन ल्यूथर किंगने. तोपर्यंत आफ्रिकी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठीची विधाने होत असत. त्याचे प्रत्यक्ष आंदोलनात रुपांतर झाले ते 1985 मध्ये. त्यावर्षी युरोपमध्ये कोलंबसच्या अमेरिका शोधण्याचा पाचशेवा वर्धापनदिन व्यापक प्रमाणावर साजरा करण्याचे ठरले. प्रत्यक्षात कोलंबसने अमेरिका 1492 मध्ये शोधली.
युरोपमधील शंभराहून अधिक कोलंबसच्या जहाजसारखी सजवलेली जहाजे आणि कोलंबसची वेषभूषा केलेले तरुण यांची मिरवणूक काढायचे ठरले. याचा परिणाम युरोपपेक्षा अमेरिकेतील ‘अ‍ॅब ओरिजिनल इंडियन’ संघटनेवरच अधिक झाला आणि त्यांनीही ‘शेवटचा कोलंबस अमेरिकेच्या भूमीवर असेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निश्चय केला. प्रत्यक्षात अमेरिकेतील स्थानिक वंशीय की जे स्वत:ला ‘अमेरिकेतील मूळचे भारतीय’ समजतात, यांचे संघटन तेवढे भक्कम नव्हते. या प्रक्रियेला 1985 मध्ये सुरुवात झाली. गेल्या 35 वर्षात अ‍ॅब ओरिजिनल इंडियन यांच्या संघटनेने जे काम केले आहे ते स्पृहणीय आहे. त्या पूर्वीच्या पाचशे वर्षात युरोपीय नरसंहारातून उरलेल्या स्थानिकांना फक्त दारुची दुकाने आणि कष्टाची कामे यात वाव मिळायचा पण त्यांची संघटना भक्कम व्हायला लागल्यावर त्या तरुण पिढीनेही शिक्षणाची तयारी केली आणि अमेरिकेत जेथे जेथे म्हणून युरोपीय पार्श्वभूमी असलेल्यांची सरकारे आहेत, त्यांना शिक्षण संस्थातून शिक्षण, संशोधन, प्राध्यापक, बहुराष्ट्रीय कंपन्यातील जबाबदारीच्या नोकर्‍या यात प्रवेश मिळाला. दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅमॅझॉन जंगल वाचवावे म्हणून गेली पन्नास साठ वर्षे लढणार्‍या रावनी मेटुकतिरे याचे नाव ‘नोबेल’ सन्मानासाठी पुढे आले. प्रत्यक्षात त्यांना तो मिळाला नाही तर त्यांचे नाव ‘नॉमिनेट’ होणे हाही मोठा भाग होता. ते प्रामुख्याने अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्ट रक्षणाच्या प्रयत्नाबाबत झाले होते. रावनी मेटुकतिरे हे आज नव्वद वर्षांचे आहेत. गेल्या शंभर वर्षात अनेक अ‍ॅब ओरिजिनलनी अनेक क्षेत्रात यश मिळवले होते, तरीही या लोकांनी शक्यतो जंगलातून बाहेरच येऊ नये, आले तर त्यांना हॉटेले, दारुचे गुत्ते, कॅसिनो पार्लर, जुगाराचे अड्डे, समुद्रचौपाटीवरील (बीच) टपर्‍या यावरच कामांसाठी किरकोळ कर्जे आणि नोकर्‍या मिळत असत.
एका बाजूला अमेरिकेत ‘अ‍ॅब ओरिजिनल इंडियन’ लोकांची चळवळ संपूर्ण उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या खंडाची राष्ट्रीय चळवळ म्हणून आकार घेऊ लागली, त्याच प्रमाणे अमेरिकेतील आफ्रिकी अमेरिकी
गुलामीची पार्श्वभूमी असलेल्यांनीही ‘आजपर्यंत आफ्रिकेतून किती जणांना गुलाम म्हणून नेले, त्यात किती मारले गेले, यांचा हिशोब सुरू केले. त्यावेळी अशी माहिती संकलित झाली की, फक्त अमेरिका आणि आफ्रिका नव्हे तर युरोप सोडून जगाच्या प्रत्येक भागातील लोकांना युरोपियनांनी गुलाम म्हणून नेले आहे. गेली पाचशे वर्षे युरोपातील प्रामुख्याने स्पेन, पोर्तुगाल आणि प्रामुख्याने ब्रिटन यांनी जगभर जे साम्राज्य केले ते देशोदेशीच्या गुलामांवरच केले आहे. परिस्थितीनुसार काहींना गुलाम म्हटले तर काहींना मजूर म्हटले येवढेच. पण ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशिया, भारत आणि फारच मोठ्या प्रमाणावर आफ्रिका या देशांचा समावेश होता. गेल्या पाच दहा वर्षात युरोपीय देशांची त्यांनी पूवीं साम्राज्य केलेल्या देशावरील आणि एकूणच जगाच्या राजकारणावरील आणि अर्थव्यवस्थेवरील पकड ढिली झाली आहे. त्यामुळे त्या त्या देशातील गुलामगिरीची पार्श्वभूमी असणार्‍यांची संघटन आणि चळवळ वाढली आहे.
 
आज जगातील अनेक देशावरील ख्रिश्चन संघटनांची पकड ढिली पडली आहे. युरोप, अमेरिका, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशात ‘अल्ट्रा ग्लोबलिझम’ नावाच्या संघटनेचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे अनेक शतके ख्रिश्चॅनिटीच्या नावाखाली सार्‍या जगावर साम्राज्य केलेल्यांची तरुण पिढी त्यांच्याच विरोधात बोलू लागली आहे. गेली पाचशे वर्षे जगात साम्राज्य केलेल्या युरोपीय ख्रिश्चनांची तरुण पिढी स्वत:ला ख्रिश्चन म्हणून घ्यायला तयार नाही. त्यामुळे सार्‍या श्वेतवर्णीय देशात आज ख्रिश्चनधर्मीय अल्पसंख्य होऊ लागले आहेत. तरुण पिढी गुलामगिरी आणि साम्राज्यवाद यांच्या विरोधात बोलू लागली आहे. ख्रिश्चन धर्माचे गेली पाच शतके असलेले वर्चस्व जसे कमी होत आहे, तसतसे या सगळ्या गुलामगिरीला ख्रिश्चन धर्मातील शिकवणच कशी कारणीभूत होत आहे, यावर जाहीर चर्चा सुरू झाली आहे.
 
ख्रिश्चन धर्माची निर्मिती कशी झाली हे सांगणारे जे ग्रंथ आहेत, त्यातील ‘जेनेसिस’ या ग्रंथातील ही गोष्ट आहे. युरोपीय श्वेतवर्णियांना अनेक पिढ्या आाणि अनेक शतके कृष्णवर्णियांना गुलाम करण्यास
मान्यता देणारी ही कथा आहे. त्या कथेनुसार - काही हजार वर्षापूवीं एका महाप्रलयात सारे जग बुडाले होते. त्यातून ईश्वर वरदान असणार्‍या काहींना वाचविण्यासाठी त्या महाप्रलयातच एक बोट आली. त्या बोटीत नोहा नावाचा एक गृहस्थ आपल्या पत्नीला आणि मुलाबाळांना घेऊन चढला. त्या सार्‍यांना काही दिवस त्या महाप्रलयी पाण्यातच काढावे लागले. नंतर हळूहळू प्रलय शांत झाला आणि त्यांचे जीवन सुरू झाले. मुले मोठी झाल्यावरचा एक प्रसंग आहे. त्याच्या मुलांची नावे साम, हाम आणि जेपेथ अशी होती.
एकदा नोहा त्याच्या घरात अस्ताव्यस्त अवस्थेत पडला होता. तो दारू प्यायला होता आणि काही प्रमाणात शुद्ध हरपली होती. त्याला त्याच्या अंगावरील कपड्याचे भान नव्हते. अशा स्थितीत त्याचा ‘हाम’ नावाचा मुलगा घरात आला. त्याच्या वडिलांची ही विचित्र स्थिती बघून त्याला हसू तर आवरले नाहीच पण तो वडिलांना ‘काय ही तुमची स्थिती’ तुम्हाला कपड्याचीही शुद्ध नाही. हाम या मुलाने अशी टिपणी केल्याबद्दल नोहाला राग आला तो रागावलाही पण काही बोलला नाही. पण त्याचा दुसरा मुलगा ‘साम’ याला वडिलांच्या त्या स्थितीची दुरूनच कल्पना आली. त्यांनी वडिलांचा अंगरखा हाती घेतला आणि वडिलांच्या त्या स्थितीकडे न बघता त्यांना देण्यासाठी तो त्या घरात पाठमोरा गेला. वडिलांना तो अंगरखा दिला.
या प्रसंगात नोहाने हाम या कृतीबद्दल त्याला श्राप दिला. तो श्राप असा होता की, ‘तू घर सोडून दक्षिणेकडे जाशील. तेथे तू तर काळा पडशीलच पण तुझ्या पुढच्या सार्‍या पिढ्या काळ्याच पडतील. त्या सार्‍या पिढ्यांना सामच्या पुढच्या पिढ्यांची सेवा करावी लागेल. बायबलच्याच भाष्यकारानुसार हाम पुढे आफ्रिकेत गेला. तेंव्हा तो तर काळ पडलाच पण त्यांची मुलेही काळी झाली. इजिप्तपासून दक्षिणेला जोहान्सबर्गपर्यंत तर जेथेे जेथे काळा समाज आहे तो हामचा वंशज आहे. त्याखेरीज आफ्रिकेतून भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथे जे लोक गेले, तेही हामचेच वंशज आहेत. त्या काळ्या लोकांनी गुलाम म्हणून श्वेत वर्णियांची सेवा करणे हीच त्यांना बायबलने घालून दिलेली शिकवण आहे.
 
युरोपीय देशांचे त्यातही ब्रिटनचे आणि प्रामुख्याने चर्चसंघटनांना जगातील ज्या देशांचा इतिहास लिहिण्याची संधी मिळाली, त्यात त्यांनी या कथेचा इतिहासाचा मुख्य स्रोत म्हणून समावेश केला. आफ्रिकेपुरते बोलायचे झाल्यास तेथून अमेरिकेतजी गुलामवाहतूक सुरू होती, त्यात आफ्रिकी लोक हे हामचे वंशज आहेत आणि त्याना गुलाम करणे ही बायबलचे आम्हाला दिलेली मान्यता आहे, असेच जाहीर केले.
गुलामांची ही ंसंख्या किती असावी, याचे गेल्या पाचशे वर्षातील आकडे चार कोटीपासून शंभर कोटीपर्यंत जातात. त्यात जेवढे लोक त्यांना बेड्या घालून नेत असत. ती प्रत्यक्ष बोटी सुरू झाल्यावर आक्रमक बनत. काही जण त्यातून सोडवणूक करण्यातही यशस्वी होत आणि पण अनेक बोटी बुडविण्यातही येत. जगातील शंभर देशापेक्षा अधिक देशांचा इतिहास हा या नोहा कथेवर आधारित आहे. जगातील एक हजार विद्यापीठापेक्षा अधिक विद्यापीठात या इतिहासाच्या आधारेच सार्‍या घटनांची मांडणी केली जाते. भारताचा शासकीय इतिहास, शिक्षण क्षेत्रातील इतिहास आणि न्यायालय प्रक्रियेतील सारा इतिहास आजही त्या ‘नोहा’कथेवर आधारित आहे.
 
भारताचा इतिहास नोहा कथेवर कसा अवलंबून असेल याबाबत अनेकांना आश्चर्य वाटेल पण ज्या प्रमाणे नोहाचा मुलगा हाम हा आफ्रिकेत गेला त्याप्रमाणे सामचा वंश कांही युरोपचा भाग आणि काही आशियाचा भाग यात विस्तारला गेला. आपल्याला नोहा स्टोरी किंवा सामचा वंश म्हटल्यावर कळणार नाही. पण सामचे वंशज म्हणजे सेमेटिक वंशाच्या काही टोळ्या म्हणजे आर्य हे भारतात आले हा ब्रिटिशांनी लिहून घेतलेला इतिहास आपल्याला मान्यच करावा लागला.
ख्रिश्चन परंपरेत ही जशी नोहा कथा आहे त्याचप्रमाणे ‘बेबल टॉवर’ही एक कथा आहे, त्यानुसार जगातील सार्‍या भाषा या बायबलमधून तयार झाल्या अशा दावा केला जातो. हे सारे दावे आता पुन्हा ऐरणीवर येण्याचा काळ आला आहे.
अमेरिकेतील मिनियापोलीस शहरात पोलिसांनी जॉर्ज फ्लॉईड याच्या गळ्यावर पाय ठेवून त्याचा जीव घेतला ही बाब गेल्या आठ दिवसात जगाने वारंवार पाहिली आहे. आता गुलामगिरीच्या विरोधातील आंदोलनाची दिशा ‘गुलामगिरी करणारी साम्राज्यशाही हटावो’ या दिशेने निघाली आहे. पुढील चार महिन्यातील महत्वाच्या निवडणुकात हा विषय प्रामुख्याने आंदोलनाच्या ऐरणीवर असेल. गेल्या पंचवीस वर्षात युरोपमधील प्रत्येक देशात युरोपेतर लोकांची संख्या वाढली आहे.
 
मध्यपूर्वेतील युद्धामुळे अनेकांनी युरोपीय देशांचा आसरा घेतला आहे. पहिली चार शतके जेथे गुलामांच्या बोटी लागत होत्या तेथे आता शरणार्थींच्या बोटी लागतात. त्यामुळे युरोपातील प्रत्येक देशातील लोकसंख्येचे गत बदलले आहे. गुलामगिरीला आणि साम्राज्यशाहीला उचलून धरलेल्यांचे पुतळे ब्रिटनमध्ये जसे आहेत, तसेच ते युरोपातील अन्य देशातही आहेत, या सार्‍यांच्या दिशेने आता जमाव निघाला आहे, असे चित्र आज दिसत आहे.
(लेखातील छायाचित्रे आकृत्या ‘डेली मेल’ लंडनवरून साभार)
मोरेश्वर जोशी, पुणे