भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचे प्रतिपादन
-
जळगाव : कोविड जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाशी खेळ चालला असून त्यांना न्याय मिळावा म्हणून आवाज उठविण्यासाठी भाजपाने निवेदन दिले. सरकार व प्रशासनाने दडपशाही मार्गाने भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी कार्यकर्त्यांवर, गुन्हे दाखल केले. मात्र यामुळे विरोधक व जनतेचा आवाज दाबता येणार नाही, असा इशारा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दिला.पालकमंत्र्यांची हतबलता व कबुली, सत्ताधार्यांचे अपयश, अधिकार्यांची मुजोरी, समन्वयाचा अभाव, राजकारण यामुळे शेकडो व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक मृत्युदर जळगाव जिल्ह्याचा असून त्यावर पांघरूण घालण्यासाठी गुन्हे दाखल करून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रकार आहे असेही सूर्यवंशी म्हणाले.
राज्याचे आरोग्य मंत्री मास्क न वापरता फिरले, ते बैठका घेत असतांना शौचालयात मृतदेह पडून असणे. त्यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे याविषयी अद्याप कोणतीही कार्यवाही अथवा गुन्हे दाखल करण्याची हिंमत प्रशासन का दाखवू शकले नाही, असेही दीपक सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.