कोरोनाच्या समूह संसर्गाबाबत ICMRची दिलासादायक माहिती

    दिनांक : 12-Jun-2020
Total Views |

dr dharav_1  H  
 
नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अशातच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) एक दिलासादायक माहिती दिली आहे. देशात अजून सामुदायिक संसर्ग झाला नसल्याचे ICMR कडून सांगण्यात आले आहे.
देशातील लोकसंख्येनुसार एक टक्क्यांहून कमी लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याचे म्हणणे चुकीचे आहे, असा खुलासा भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी केला. मुंबई, दिल्लीसह देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक झपाट्याने वाढू लागल्याने देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाला असल्याचे सांगण्यात येत होते. यावर बलराम भार्गव स्पष्टीकरण दिले आहे.
 
कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण छोट्या जिल्ह्यांमध्ये एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर शहरी भागात संसर्गाचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या देशात कोरोनाचा समूह संसर्ग अजूनही झालेला नाही, असे दिसून येते, अशी माहिती बलराम भार्गव यांनी दिली आहे.
 
 
भारतात आतापर्यत ५० लाखांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तसेच, कोरोना चाचण्यांसाठी राज्य सरकारांनी सरकारी आणि खासगी दोन्ही प्रयोगशाळेचा वापर करावा, असेही त्यांनी आवाहन देखील बलराम भार्गव यांनी केले आहे. देशभरात लॉकडाऊन करत आपण जी पावले उचलली, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आणि वेगाने त्याचा होणार फैलाव थांबवण्यात यश मिळाले असल्याचे देखील बलराम भार्गव यांनी यावेळी सांगितले.