टी.बी.रुग्णालय पुन्हा नव्याने सुरु करा

    दिनांक : 11-Jun-2020
Total Views |
पालकमंत्री ना. पाटील यांचा मनपा आयुक्तांना प्रस्ताव

mnpa_1  H x W:  
 
जळगाव : शहरातील मेहरूण परिसरात अनेक वर्षांपासून बंद पडलेले टी.बी.रुग्णालय पुन्हा नव्याने सुरु करण्याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मनपा आयुक्तांना प्रस्ताव तयार करण्याचा सूचना दिल्या.
 
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा कर्मचार्‍यांसाठी दिलेल्या सॅनिटायझर व इतर साहित्य वाटप करण्यासाठी पालकमंत्र्यांनी बुधवारी महापालिकेत भेट दिली. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शिवसेनेचे नगरसेवक अनंत जोशी, नितीन बरडे, प्रशांत नाईक, अमर जैन, मनोज चौधरी, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.
 
 
त्यानंतर आयुक्तांच्या दालनात पालकमंत्र्यांनी शहरातील स्थितीचा आढावा घेत, शहरात सर्वेक्षण सुरु ठेवण्याचा सूचना दिल्या. त्यावेळी आयुक्त कुलकर्णी व मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी पालकमंत्र्यांकडे टी.बी.रुग्णालयाची दुरुस्तीची मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करून, राज्य शासनाच्यावतीने सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.
 
 
जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत पालकमंत्री नाराज
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भोंगळ कारभाराचे अनेक प्रकार समोर येत असताना, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील जिल्हा रुग्णालयात गचाड कारभार सुरु असल्याचे मान्य केले आहे. आयुक्तांच्या दालनात झालेल्या चर्चेत पालकमंत्र्यांनीही जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र, जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या कामांचे कौतुक त्यांनी केले. कोरोनाच्या समस्येनंतर जिल्हा रुग्णालय हे चांगल्या दर्ज्याचे रुग्णालय म्हणून समोर येईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
दरम्यान, पावसाळ्यात सर्पदंशो प्रकार घडत असतात. त्यातच जिल्हा रुग्णालय गोदावरी रुग्णालयात हलविल्यामुळे रुग्णांना काही प्रमाणात उपचार मिळण्यास उशीर होवू शकतो. अशा परिस्थितीत मनपा क्षेत्रातील शिवाजीनगर भागातील मनपा रुग्णालयात ओपीडी सुरु करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सर्पदंश, कुत्र्यांचा चावा अशा रुग्णांवर उपचार करण्याचा सूचना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
रुग्णालयातील ५२ क्वार्टर धूळखात
टी.बी. रुग्ण विलगीकरणासाठी हे रुग्णालय बांधण्यात आले होते. मात्र, १९९० नंतर टी.बी.चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या रुग्णालयाचाही वापर कमी होवू लागला. १९९६ पासून हे रुग्णालय बंद असून, याठिकाणी ५२ क्वार्टर धुळखात आहेत. मनपाच्या सर्व घंटागाड्या याठिकाणी थांबविल्या जात असून शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता क्वारंटाईनसाठी या रुग्णालयात व्यवस्था होऊ शकते.