चोराच्या उलट्या बोंबा, इमरान खानची भारताला धमकी!
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :19-Feb-2019
 

 
इस्लामाबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे वृत्त पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी फेटाळले आहे. “भारताने युद्धाला सुरुवात केल्यास, पाकिस्तान त्याला उत्तर द्यायला विचार करणार नाही.” अशी धमकी इमरान खान यांनी भारताला दिली.
 
 
“कोणताही पुरावा नसताना भारताकडून उगाच पाकिस्तानवर आरोप केला जात आहे. सध्या भारतामध्ये निवडणूकीचा काळ आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा. अशी चर्चा भारतात सुरु आहे. हे मी समजू शकतो.” असेही इमरान खान यांनी म्हटले. पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी पाकिस्तानची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. “मी भारतीय सरकारसाठी उत्तर देत आहे.” असे म्हणत पत्रकार परिषेदच्या सुरुवातीलाच इमरान खान यांनी म्हटले.
 
तसेच पत्रकार परिषदेदरम्यान, ‘हा नवा पाकिस्तान आहे. नवी विचारसरणी आहे’ असेही ते म्हणाले. ‘आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहोत. भारताने आम्हाला पुरावे द्यावेत.’ अशी मागणी इमरान यांनी केली. ‘पुरावे खरे असल्यास आम्ही कारवाई करू.’ असे आश्वासन भारताला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ‘दहशतवाद मिटावा ही आमचीही इच्छा आहे. ७० हजार पाकिस्तानी दहशतवादामुळे मारले गेले आहेत.’ अशी माहिती त्यांनी दिली. तसेच “भारताला नव्या विचारसरणीची गरज आहे. काश्मीरमध्ये अशी परिस्थीती का उद्भवली? यावर भारताने विचार करण्याची गरज आहे. भारताने चर्चा करून काश्मीरप्रश्न सोडवायला हवा. काश्मीरप्रश्नाकडे भारत का लक्ष देत नाही?” असा प्रश्न इमरान खान यांनी या पत्रकार परिषदेत विचारला.