पाकिस्ताननेही उच्चायुक्ताला परत बोलवले
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :18-Feb-2019
 
 
इस्लामाबाद,
पुलवामा येथे सीआरपीएफवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील उच्चायुक्तांना परत बोलवण्याच्या कृतीला तसेच उत्तर देत, पाकिस्तानने भारतातील उच्चायुक्ताला सल्लामसलतीसाठी परत बोलवले आहे.
 
 
पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल मोहम्मद यांनी सोमवारी सकाळी भारत सोडल्याची माहिती पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी दिली. सल्लामसलतीसाठी आम्ही भारतातील उच्चायुक्ताला बोलवले आहे. त्यांनी आज सकाळी भारत सोडला, अशी माहिती त्यांनी दिली. सोहेल मोहम्मद किती दिवस पाकिस्तानात थांबतील हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
 
परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी शुक्रवारी त्यांना हजर राहण्याचे आदेश दिल्यावर त्यांच्याकडे पुलवामा येथील हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला होता. या हल्ल्यानंतर सल्लामसलत करण्यासाठी भारताने पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत बोलवले आहे.