सर्व बहुजनांनी एकत्र येण्याची गरज - ऍड. प्रकाश आंबेडकर
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :15-Feb-2019

 
 
मुक्ताईनगर, १४ फेब्रुवारी
लुटारू व नफेखोर शासन उंचविण्यासाठी तसेच लोकांचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी वंचितांना न्याय व सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी सर्व बहुजनांनी एकत्र येण्याची गरज आहे त्यासाठीच वंचित बहुजन आघाडीची निर्मिती करण्यात आली असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित सत्तासंपादन मेळाव्याप्रसंगी केले.
 
 
येथील एस. एम. कॉलेज शेजारील बर्‍हाणपूर रोडलगत असलेल्या भव्य पटांगणात वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघ, एमआयएम यांच्यातर्फे भव्य सत्तासंपादन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक भारिप बहुजनचे विनोद सोनवणे यांनी केले. याप्रसंगी एमआयएमचे फिरोज शेख, भारिपचे निरीक्षक शरद वसत्कर, विवेक ठाकरे, आ. बळीराम शिरस्कर, डॉ. दशरथ भांडे, धनगर समाजाचे नेते नाना पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, बाळासाहेब हे वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी एक सक्षम असं नेतृत्व असून आता सर्व बहुजनांनी जात-पात विसरून त्यांचे हात मजबूत करण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी सर्व वंचित घटकांना दिलेले अधिकार आज अमलात आणले जात नाहीत. त्यासाठी राज्यकर्त्यांची विकृत मनोवृत्ती जबाबदार आहे. सत्ताधार्‍यांनी आजपर्यंत धनगर समाजाची फसवणूकच केली असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी कुंभार समाजाचे मनोज कापडे यांचीही उपस्थिती होती. यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून नितीन कांडेलकर यांचे नाव घोषित केले.