नागपूर: विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात आजपासून सुरू झालं आहे. हे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांनी 'मी पण सावरकर' अशा टोप्या घालत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसंच राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे आगामी काळातही याच मुद्द्यावरून भाजप सरकारला लक्ष्य करणार असल्याचं दिसत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. "माफी मागायला मी सावरकर नाही" अश्या शब्दात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी उद्गार काढले होते. नागपूर येथे आजपासून हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप आमदारांनी 'मी पण सावरकर' असलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपाने यावेळी केली.