अस्वस्थतता असू द्या, अविचार नको!

    दिनांक : 11-Dec-2019
रमेश पतंगे
 
सध्या महाराष्ट्रात पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या बातम्या गाजत आहेत. या दोन्ही नेत्यांविषयी अशा बातम्या पेरल्या जात आहेत की, ते भाजपा सोडण्याचा निर्णय करतील. एकनाथराव खडसे यांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीला निवडणुकीत पाडण्यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी प्रयत्न केला. तसेच पंकजा मुंडे यांना पराभूत करण्यासाठी काही भाजपा नेते कारणीभूत आहेत. हे नेते कोण आहेत, याची माहिती त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना दिली आहे. वर्तमानपत्रांत त्यांनी ही बातमी जाहीर केलेली नाही. पंकजा मुंडे यांनी टि्‌वटरवरून काही दिवसांपूर्वी भाजपाचा लोगो काढून टाकला. त्या जे काही म्हणाल्या, ते त्यांच्या शब्दांत असे, ‘‘मी आपल्याला वेळ देणार आहे... आठ ते दहा दिवसांनंतर... हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय्‌. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करूनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.’’
 

m_1  H x W: 0 x 
 
एकनाथ खडसे यांनी असे वक्तव्य दिले आहे की, ‘‘मला कोर कमिटीच्या बैठकीसाठी निमंत्रण नसते. निर्णयप्रक्रियेत माझा सहभाग नसतो आणि जर अशाच प्रकारे अपमानित करणे चालू राहिले, तर मला अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल. मी कुणी देव नाही, माणूसच आहे. मलादेखील भावना आहेत, पक्ष सोडावा अशी माझी इच्छा नाही, चार दशके मी पक्षासाठीच काम केले आहे.’’ पंकजा मुंडे यांच्या टि्‌वटरचा वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ प्रसारमाध्यमाने काढायला सुरुवात केली. 15 ओबीसी आमदारांसह पक्ष सोडणार का? ब्राह्मण नेतृत्वाविरुद्ध ओबीसी नेतृत्व बंड करणार का? शिवसेनेत जाणार का? या प्रकारच्या बातम्या, वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांच्या स्वभावाप्रमाणे, पदरचे अधिक घालून देण्यात आल्या. त्याला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘मी भाजपाची समर्पित कार्यकर्ती आहे. माझे स्वर्गीय पिता गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाच्या वाढीसाठी अपार कष्ट घेतले. त्यांच्या जयंतीच्या अगोदर दरवर्षी मी असे लिहीत असते. यावेळी त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला.’’
 
 
एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे नेतृत्व ओबीसीवर्गातून पुढे आलेले आहे. महाराष्ट्राचे राजकारण दाखवायला पुरोगामी आणि जातिविरहित राजकारण असल्याचे सांगितले जाते. वास्तवात कोण कुठल्या जातीचा आहे, याचा शोध घेतला जातो आणि त्याच्या नेतृत्वाच्या मागे त्याची जात जोडली जाते. भाजपाचे नेतेही त्याला अपवाद नाहीत. देवेंद्र फडणवीस म्हणजे ब्राह्मणांचा नेता, विनोद तावडे मराठा समाजाचा नेता, एकनाथ खडसे आणि पंकजाताई ओबीसीवर्गाचे नेते, अशी मांडणी वर्तमानपत्रांतील पुरोगामी आणि जातनिर्मूलनवादी जाणूनबुजून करीत असतात. एका बाजूला हेच लोक म्हणणार की, भाजपा िंहदुत्ववादी पक्ष आहे. िंहदूंचे नेतृत्व करतो. मुसलमानांना भाजपात स्थान नाही. त्यांच्या मतांची भाजपा िंचता करीत नाही. िंहदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा प्रयत्न असतो आणि त्याच लेखणीने हे सांगणार की, भाजपाचे नेते वेगवेगळ्या जातींचे नेते आहेत. यामध्ये विसंगती आहे, असे जर आपण त्यांना सांगायला गेलो तर पुरोगामी म्हणतील की, सुसंगती हा गाढवाचा गुणधर्म आहे आणि आम्ही गाढवापेक्षाही वरच्या दर्जाचे (गाढव) असल्यामुळे आमच्यात सुसंगती शोधू नये. राजकीय नेत्यांचे अस्वस्थ होणे, रुसणे-फुगणे, अधिक मुखर होऊन आपल्या व्यथा व्यक्त होणे, यात काही गैर आहे, असे नाही.
 
 
राजकारणात जे शांत बसतात, त्यांना कुणी विचारत नाही. जे सदैव या ना त्या प्रकारे क्रियाशील असतात. आपले अस्तित्व सतत दाखवीत राहतात, तेच पुढे जातात. काही जण आपल्या मतदारसंघापुरते सीमित राहतात. पण, तिथे त्यांचे अस्तित्व पावलोपावली जाणवत राहते. काही जण प्रादेशिक राजकारणात क्रियाशील राहण्याचा प्रयत्न करतात. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या अस्वस्थतेला कारणे आहेत. ती नजरेआड करून चालणार नाहीत. पक्षनेतृत्व त्याची योग्यप्रकारे दखल घेईल. ते त्यांचे काम आहे. त्यात त्यांनी जर चूक केली िंकवा चालढकल केली तर जे काही परिणाम होतील, त्याची जबाबदारी त्यांच्यावर येईल. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका अवघड असते, परंतु सगळ्यांना बरोबर घेतल्याशिवाय राजकारणात यशस्वी होता येत नाही. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे आज पक्षात आहेत, उद्याची स्थिती काय असेल? हे सांगता येत नाही. पण, एक गोष्ट नक्कीच सांगता येते की, भाजपा हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. तो जोपर्यंत विचारधारेवर चालणारा पक्ष राहील तोपर्यंत संघ स्वयंसेवक त्याच्यामागे उभे राहतील, ज्या क्षणी विचारधारेशी तडजोड केली जाईल िंकवा ती सोडण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा संघ स्वयंसेवक भाजपाला सोडचिठ्ठी देतील. भाजपाचे यश-अपयश विचारधारेवरच अवलंबून आहे. पक्षाची प्रतिमा पक्षातील नेते निर्माण करीत असतात. गोपीनाथ मुंडे यांनी 1993च्या बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्र विधानसभेत एकाकी झुंज दिली.
 
 
विचारधारेला ते चिकटून राहिले. भाईगँगला आव्हान देण्याची िंहमत त्यांनीच दाखविली. त्यामुळे सगळे स्वयंसेवकच नव्हे, तर देशभक्त समाज गोपीनाथरावांच्या मागे उभा राहिला. ते कोणत्या जातीचे आहेत, याचा पुरोगामी शोध कुणी घेतला नाही. ते ओबीसींचे नेते, असेही कुणी म्हणाले नाही. ते लोकनेते आहेत, जननेते आहेत, असेच सर्वांनी मानले आणि त्यांच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी उभे राहिलो. या काळात क्षणिक मोहाला बळी पडून दोन-चार जण भाजपा सोडून गेले. मराठवाड्यातील एक कर्तृत्ववान मराठा भाजपा सोडून गेला. त्यांचे नाव मी लिहीत नाही. आज ते भाजपात असते, तर पहिल्या श्रेणीच्या नेत्यांत त्यांची गणना झाली असती. निर्णयप्रक्रियेतील ते महत्त्वाचे नेते झाले असते. आपल्या हाताने त्यांनी कर्तृत्वाचे वाटोळे करून घेतले. मंत्रिपदाचा क्षणिक मोह, खासदारकीचा क्षणिक मोह, आयुष्याची पुण्याई राखरांगोळी करून टाकतो. शंकरिंसह वाघेला यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली, आज जनतेने शंकरिंसह वाघेला यांना सोडचिठ्ठी दिली आहे. ते निष्ठेने भाजपात राहिले असते, तर कुणी सांगावे ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले असते.
वैचारिक निष्ठा नेत्याला प्रचंड नैतिक बळ देते. नेतृत्व नैतिक बळावरच उभे राहते. जातीच्या कुबड्या त्यासाठी काही उपयोगाच्या नसतात. आजूबाजूला सुमार कर्तृत्वाची माणसे आणि स्वार्थाचा सल्ला देणारी माणसे गोळा करता कामा नयेत. मन उद्विग्न झाले की, आपल्याला प्रियकर असणारे सल्ले गोड वाटू लागतात. असले गोड सल्ले दीर्घकालीन विचार केला तर कडू फळ देणारे असतात. पंकजाताईंसंबंधी भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने खाजगीत उद्गार काढले होते की, ‘‘यह लंबे रेस का घोडा हैं।’’ याचा दीर्घकालीन विचार करता, ज्यांचे राजकारणातील भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे, असा याचा अर्थ होतो. ज्यांना दीर्घकालीन राजकारण करायचे आहे, त्यांनी दीर्घकालीन योजना करूनच काम करायला पाहिजे. निवडणुकीतील यश-अपयश हे तात्कालिक असते. म्हणून शहाण्या राजकारण्याने निवडणुकीतील यशाची हवा डोक्यात शिरू देता कामा नये आणि पराभव झाल्यामुळे हाताश होता कामा नये. जगातील कोणताही महान राजकीय नेता, राजकारणात उतरल्यानंतर पहिल्या दिवसापासून यशस्वी झालेला नसतो. िंलकनचे उदाहरण घेऊ या... अध्यक्ष होण्यापूर्वी िंलकन राजकारणातील अयशस्वी माणूस होता. सिनेटची निवडणूकही तो िंजकू शकला नाही. कॉंग्रेसमध्ये (आपल्या भाषेत लोकसभेत) केवळ तो दोन वर्षे होता, पुन्हा निवडून आला नाही. राज्य चालविण्याचा अनुभव शून्य होता. तो अशा वेळी राष्ट्राध्यक्ष झाला, ज्या वेळी अमेरिकेपुढे जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला. अमेरिकेचे दोन तुकडे झाले. गृहयुद्ध सुरू झाले. युद्धाचा िंलकनला अनुभव शून्य, अर्थव्यवस्थेचा अनुभव शून्य, पण आज अमेरिकेतील प्रत्येक माणूस म्हणतो की, िंलकन इतका महान राष्ट्राध्यक्ष आणखी दुसरा कुणी नाही! िंलकनकडे एकच गोष्ट होती, ती म्हणजे देश एक ठेवण्याचा पक्का विचार आणि त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी.
अस्वस्थ नेत्यांना एवढेच सांगता येण्यासारखे आहे की, अस्वस्थता असू द्या, तिचे रूपांतर अविचारात करू नका. तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे. स्वतःची व्यक्तिगत गार्‍हाणी गात बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे व्यापक विषय हाती घ्या. त्या विषयाशी एकरूप व्हा. स्वतःला समर्पित करा. काही न मागता सवकाही तुमच्या दारी आपोआप उभ्या राहतील.